
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांचे कान टोचले आहेत. आरबीआयने रेपो रेट वाढवतच या बँका कर्जावरील व्याज तत्काळ वाढवतात, पण ग्राहकांना बँकेच्या बचत खात्यावर व्याज कमी देतात. आता बँकांनी बचत खात्यावरही जास्त व्याज द्यावे, असे आवाहन आरबीआयने सर्व बँकांना केले आहे.
खासगी व सरकारी बँका आपल्या ग्राहकांना २.७० ते ४ टक्के व्याज देतात. बँकेतील एकूण जमा रकमेतील एक तृतीयांश रक्कम ही बचत खात्यातील असते. तरीही बँकेतील बचत खात्यातील व्याज कमी असते.
आरबीआयने गेल्यावर्षी रेपो दर २.५० वरून ६.५० टक्क्यांवर नेला. ज्याप्रमाणे कर्जावरील व्याज बँकांनी वाढवले तसेच जमा रकमेवरही अधिक व्याज द्या. आरबीआय आपल्या बैठकीत बँकांना बचत खात्यावरील व्याजदरात वाढ करण्यासाठी प्रेरित करत असते.
बँकांच्या नफ्यावर परिणाम होईल
एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बचत खाते चालवण्यासाठी लागणारा खर्च अधिक आहे. व्याजदरात २० ते २५ बीपीएस वाढ केल्यास बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होऊ शकेल. त्याचा परिणाम बँकांच्या ताळेबंदावर होऊ शकेल.
कर्जावरील व्याजदर वाढवल्याने बँकांचा नफा वाढलेला दिसत आहे. यस बँक, कोटक-महिंद्रा बँक व इंडसइंड बँकेने सांगितले की, बचत खात्यावरील व्याज वाढवण्याची त्यांची योजना नाही. दरम्यान, काही छोट्या बँका बचत खात्यावर ७ टक्के व्याज देत आहेत.
पूर्णवेळ संचालक गरजेचा
खासगी व परदेशी बँकांना दोन पूर्णवेळ संचालक गरजेचे आहेत, असे आरबीआयने सांगितले. यात व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हे समाविष्ट होऊ शकतात. ज्या बँकेकडे दोन पूर्णवेळ संचालक नाहीत, त्यांनी चार महिन्यांत ते भरावेत, असे आरबीआयने सांगितले.