
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज काय? असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित केला व यामागची कारणमीमांसा पटवून देण्यासाठी याचिकाकर्त्याला दोन आठवड्याची मुदत देत सुनावणी तहकूब केली.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची स्वतंत्र तपास यंत्रणेर्मात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दिशा सॅलियन हिने आत्महत्या करण्यापूर्वी ८ जून २०२० रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सुरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे. त्या रात्री हे सर्वजण १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासण्याबरोबरच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
ठाकरेंचीही याचिका
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही याप्रकरणी हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल आहे. आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, असा अर्ज ठाकरेंच्यावतीने देण्यात आला आहे.