

मुंबई : येत्या पावसाळ्यात उत्तर मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या सुरू असलेली उत्तर मुंबईतील रस्त्यांची आणि नालेसफाईची सर्व कामे कोणत्याही स्वरूपात ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी दिली. दरम्यान कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशीही सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केली.
उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पियूष गोयल यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, पोलीस अशा सर्वच विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौथी आढावा बैठक शनिवारी महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेतली.
पोयसर आणि दहिसर नद्यांच्या पात्रांच्या रुंदीकरणसह नालेसफाईचे काम २५ टक्के पूर्ण झाले असून त्यासोबत उत्तर मुंबईतील चार विभाग कार्यालयांच्या अंतर्गत सुरू असलेली २१२ रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पुर्ण करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे पियूष गोयल यांनी सांगितले.
मालाड येथील मालवणी परिसरात अतिक्रमण करण्यासाठी भूमाफिया अहोरात्र येथे ट्रकद्वारे भरणी करत आहेत. या ट्रकविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. या कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात यावे तसेच अंबुजवाडी आणि आक्सा येथे दोन नवी पोलीस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गोयल यांनी संबंधित विभागांना दिले. उत्तर मुंबईत अकरा तलाव असून त्यात भरणी करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.