'मुख्यमंत्री शिंदेंनी हिंमत केली म्हणून...' नाव न घेता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साधला निशाणा

आज मेट्रो उदघाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा
'मुख्यमंत्री शिंदेंनी हिंमत केली म्हणून...' नाव न घेता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साधला निशाणा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "२०१९मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे राज्यात डबल इंजिन सरकार आले. त्यांच्याच शब्दावर विश्वास ठेवून जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिले होते. पण काहींच्या बेईमानीमुळे जनतेच्या मनातले सरकार आले नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. जनतेच्या आणि मोदींच्या आशिर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेचे सरकार बनले." असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "कोरोना काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टपरीवाल्यापासून ते हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली होती. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यामध्ये गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरीही, पुन्हा एकदा आमचे सरकार आल्यानंतर मुंबईतील एक लाख हातगाडी आणि टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. तब्बल १ लाख १५ हजार लोकांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे मोदी हे एकमेव पंतप्रधान असतील, ज्यांनी ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले त्याचे उद्घाटनही केले."

logo
marathi.freepressjournal.in