दिवाळीत गावाला जाताना खिसा रिकामा होणार; लक्झरी प्रवास महागला

गेली दोन वर्षे कोरोनामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होती. आता सर्व निर्बंध हटले आहेत
दिवाळीत गावाला जाताना खिसा रिकामा होणार; लक्झरी प्रवास महागला

दिवाळीला अवघे दोन आठवडे राहिलेली असतानाच सर्वांनाच आपापल्या घरी जायचे वेध लागले आहेत, मात्र खासगी एसी स्लीपर बसने गावाला जायचे असल्यास तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. कारण खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी मुंबई-नागपूर वातानुकूलित शयनयान (स्लीपर बस) प्रवासाचे तिकीट चार ते पाच हजार रुपये निश्चित केले आहे. सध्या हेच दर १५०० ते १८०० रुपये आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होती. आता सर्व निर्बंध हटले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यंदा प्रवासी संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला असून, त्यामुळे तिकीट दरात वाढ झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे गणेशोत्सव आणि दिवाळीत प्रवाशांची संख्या घटली होती.

गर्दीच्या काळात सरकारने एसटी भाडेदराच्या दीडपट भाडे आकारण्याची मुभा खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना दिली आहे, मात्र प्रत्यक्षात दुपटीपेक्षाही अधिक दर आकारले जात आहेत. यावेळी २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी असून, त्यापूर्वी १८ ऑक्टोबरपासूनच खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी भाडेदरात वाढ केली आहे.

मुंबई-कोल्हापूर वातानुकूलित शयनयान बसचे ८०० रुपये असलेले तिकीट दर दिवाळीत दोन हजार रुपये, तर केवळ आसन प्रकारातील वातानुकूलित बसचे दरही ५०० रुपयांवरून १२०० ते १५०० रुपये झाले आहेत. मुंबई-औरंगाबाद वातानुकूलित शयनयान प्रवासासाठीही दोन हजार रुपये मोजावे लागणार असून, सध्या हेच दर ६५० ते ७०० रुपये आहेत. याच मार्गावर विना वातानुकूलित आसन बसचे तिकीटही ४०० ते ५०० रुपयांऐवजी १२०० ते १३०० रुपये झाले आहे. सिंधुदुर्गसाठीही वातानुकूलित शयनयान बसचा प्रवास २३०० ते तीन हजार रुपये झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in