अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. सण विनाविघ्न पार पडावे यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मुंबईत १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत लँटर्न (उडते कंदिल) उडवण्यावर व विक्री करण्यास पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे.
दिवाळी म्हंटलं की बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे कंदील, फटाके, शोभेच्या वस्तू दाखल होतात. यामध्ये मागील काही वर्षांपासून चायनीज लँटर्न उडविण्याचे प्रमाण वाढत आहे. नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या पट्ट्यात हे लँटर्न विकले जातात व तेथेच ते आकाशात सोडले जातात. लँटर्नच्या तळाशी ज्वालाग्रही पदार्थ लावून ते हवेत सोडण्यात येतात. मात्र या लँटर्नमुळं मरिन ड्राइव्हसमोरील इमारती व सतत धावणाऱ्या वाहतुकीलाही त्याचा धोका संभवतो. तर पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान होते. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी तसेच सणासुदीच्या दिवसांत धोका टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी या लँटर्नवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या दिवसांत मुंबईत हे लँटर्न विक्री करण्यास व उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुकतेच मुंबई पोलिसांकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या नियमांचे पालन न झाल्यास १८८ अंतर्गंत गुन्हा दाखल होणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.