
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवापासून राज्यातील काही नेते संशयाच्या भोवऱ्यात सापडले असताना आता पक्ष बळकटीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कारवाईचं हत्यार उपसल्याची चर्चा आहे. राज्यातील विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या हाराकिरीमुळे काही पक्षनेत्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल ११ मते फुटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती; पण दरम्यानच्या काळात महाआघाडी सरकार कोसळल्याने काँग्रेसमधील या मतफुटीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता पक्षश्रेष्ठींनी या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे मोहन प्रकाश यांना सांगण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या ११ आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळीही काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते.