मुंबई : पवई तलावाच्या अचूक सीमांकनासाठी मुंबई महापालिकेने व्यापक सर्वेक्षण प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी तब्बल १.७८ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच आयुक्त भूषण गगरानी यांनी मंजुरी दिली आहे. तर तलावाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागांमध्ये सीमारेषांविषयी स्पष्टता नसल्याने विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे 'टोटल स्टेशन' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणे आहे.
पवई तलावाच्या भूसीमांबाबत वेस्टीन हॉटेल आणि आयआयटी मुंबई यांच्यात सतत वाद होत असल्याने पवई तलावाचे निश्चित सीमांकन करण्याचे मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर निर्देश जल विभागाने विस्तृत सर्वेक्षण आराखडा तयार केला आहे. या कामासाठी ६ कंत्राटदारांनी निविदा दाखल केली होती. तांत्रिक परीक्षणानंतर सर्वात कमी दर सादर करणाऱ्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.
तलावाभोवती अतिक्रमण
महापालिकेने या सर्वेक्षणासाठी १२ महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. यातील काही निधी चालू आर्थिक वर्षात उपलब्ध असून, उर्वरित रक्कम पुढील अंदाजपत्रकातून करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. तलावाभोवतीच्या महापालिकेच्या जमिनीवर अनेक अतिक्रमणे झाली आहे. तलावाची निर्मिती १८९० साली करण्यात आली असून २२३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या तलावाचा परिघ १०.६० किलोमीटर आहे. ५ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पूर्वेकडील किनाऱ्याचे सीमांकन अद्याप स्पष्ट नाही.
अशी असणार प्रक्रिया
'टोटल स्टेशन' तंत्रज्ञानाद्वारे तलाव परिसराचे अचूक सर्वेक्षण. ऑटोकॅडवर तपशीलवार
नकाशे व अभिलेख तयार करणे. माहिती शहर सर्वेक्षण विभाग व विकास आराखड्यात समाविष्ट करणे.
महापालिकेच्या भूखंडांची कागदपत्रे एकत्र करणे.
तलावाभोवती काँक्रीट सीमांकन खांब उभारणे