जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार बॅटिंगला सुरूवात केली आहे. पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव मंगळवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. दरम्यान, पवई तलावातील पाण्याचा पिण्यासाठी नाही तर औद्योगिक कामासाठी वापर करण्यात येतो, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पवई तलावाची क्षमता ५४५ कोटी लीटर एवढी असून या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.
मुंबईत तीन दिवसांत ४८० मिमी पाऊस
बुधवारपासून पावसाने मुंबईत हजेरी लावली असून शुक्रवारी उसंती घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी दिवसभरात पावसाने मुंबईत जोरदार बॅटिंग केली. गेल्या तीन दिवसांत मुंबईत तब्बल ४८० मिमी पावसाची नोंद झाल्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.