
मुंबई : वाहतूककोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असिम गुप्ता, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधन-कारक ठरणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन १४ सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा.
नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले की, भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर 'पे अँड पार्क' वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच खासगी सोसायटी व जागा मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळेच्या पश्चात (रात्री १२-६) 'पे अँड पार्क' वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेने चाचपणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत, त्या रस्त्यांवर वाहतूककोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेने एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तसेच 'पे अँड पार्क' वर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी 'फास्टॅग' वर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणे शक्य होईल. तसेच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावे. जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील, अशी सूचना सरनाईक यांनी यावेळी केली.
पार्किंग व्यवस्था निर्माण करा
महानगरातील जागेची कमतरता लक्षात घेता उद्याने व बगीचा याच्या खाली भूमी अंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, ठाणे शहरांमध्ये ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला असून तो पथदर्शक असल्यामुळे इतर महापालिकेने देखील त्याचे अनुकरण करावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.