प्रकल्पबाधितांना पालिकेकडून हक्काचा आसरा मिळणार

पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोचणाऱ्या रस्त्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.
 प्रकल्पबाधितांना पालिकेकडून हक्काचा आसरा मिळणार
Published on

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात बाधितांना कांजूर येथे सदनिका देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ९०६ प्रकल्पबाधितांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी कांजूर येथे तब्बल ३३२ कोटी रुपये खर्च करत २३ मजली सात इमारती बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांना पालिकेकडून हक्काचा आसरा मिळणार आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या बांधकामात सुमारे ६०० कुटुंबे, ५१ अनिवासी गाळे आणि १०० वंचित कुटुंबांचे पुनर्वसन पालिकेला करणे गरजेचे आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा चौथा महत्त्वाचा जोडरस्ता असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सध्या चार टप्प्यांत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोचणाऱ्या रस्त्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. तर रेल्वे हद्दीतील कामासाठी पालिकेने १०२ कोटी रुपये दिले असून हे कामदेखील यावर्षीच पूर्ण होणार आहे; मात्र या संपूर्ण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने कांजूर येथील भूखंड निवडला आहे. दरम्यान, या कामाची कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील २१ महिन्यांत काम पूर्ण अपेक्षित आहे, असे पालिकेच्या इमारत विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in