

एस. बालकृष्णन/मुंबई
वडापाव, मिसळपाव, कोथिंबीरवडी, थालीपीठ आणि पीयूष यासारख्या चविष्ट, चटकदार पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय ‘आराम’ हॉटेल स्थलांतरित होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऐतिहासिक कॅपिटल सिनेमा इमारतीत हे ‘आराम’ हॉटेल ८७ वर्षे जुने आहे. हे हॉटेल अनेक दशकांपासून मुंबईकरांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनले आहे. या इमारतीचा ताबा आता ‘के. रहेजा समूहा’कडे गेल्याने या हॉटेलच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
‘के. रहेजा समूहा’ने या वर्षाच्या सुरुवातीला १४७ वर्षे जुन्या आणि हेरिटेज ग्रेड-२ श्रेणीत असलेल्या कॅपिटल सिनेमाचा भाडेपट्टाधारक असलेल्या ‘नादिर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’चे संपादन केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) या जागेचा भाडेपट्टा ३० एप्रिल २०३५ पर्यंत वाढवून दिला आहे. विकासकाला इमारतीचे ऐतिहासिक स्वरूप जपावे लागणार असून, या जागेचा वापर केवळ चित्रपटगृह, दुकाने आणि रहिवासी कारणांसाठीच करणे बंधनकारक आहे. इमारतीमधील एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरच्या प्रतिनिधीने त्यांना जागा रिकामी करण्यासाठी २० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली.
रहेजा योग्य न्याय देतील
‘आराम’ हॉटेलचे कौस्तुभ तांबे यांनी सांगितले की, अद्याप आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. आम्ही येथे अनेक दशकांपासून लाखो ग्राहकांना सेवा देत आहोत. रहेजा समूह योग्य न्याय देईल आणि आम्हाला येथून हलवणार नाही, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.