महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काही दिवसांपूर्वीच जमेनीवर तुरुंगातून बाहेर आले. त्यांनतर आता त्यांनी माध्यमांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांचा मला रात्री फोन आला होता. याआधीही त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी केली आहे. मात्र, भारत जोडो यात्रा सुरु असतानादेखील त्यांनी प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती. आम्हाला तुमची काळजी होती, म्हणून फोन केल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे संजय राऊत राहुल गांधींबद्दल बोलताना म्हणले की, "राजकारणात सध्या कडवटपणा आलेला आहे. राहुल गांधी यांनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक आहे. व्यग्र कार्यक्रमात असताना वेळ काढून त्यांनी मला फोन केला. राजकारणात आज कोणी कोणाचा मित्र राहिलेला नाही. मी तुरुंगात असताना माझ्या घरी किती लोक आले, याची मला कल्पना आहे. किती लोकांनी माझी चौकशी केली, याचीही मला कल्पना आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, शरद पवार, पवार यांचे कुटुंबीय, काँग्रेसचे इतर सहकारी अशा लोकांनी माझी चौकशी केली." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुढे त्यांनी, "भाजप, मनसे हे आमचे एकेकाळचे सहकारी होते. मात्र त्यांना माझी चिंता वाटली का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यासारखे नेतृत्व देशभरात फिरत आहे. आमचे थोडेफार राजकीय मतभेद असतानाही त्यांनी माझी वारंवार चौकशी केली,असेही संजय राऊत यांनी पुन्हा सांगितले.