राहुल गांधींचा होणार मुंबईत सत्कार

५०० ते ८०० पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे
राहुल गांधींचा होणार मुंबईत सत्कार

मुंबई : इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने आघाडीचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील मुंबईत येणार आहेत. प्रदेश काँग्रेसतर्फे दादर येथील टिळक भवन येथे राहुल गांधींचे अभिनंदन आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र जागेअभावी निवडक पदाधिकाऱ्यांनाच येथे प्रवेश असणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून टिळक भवनऐवजी अन्य मोठ्या जागी हा सत्कार आयोजित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

इंडिया आघाडीने राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला अन्य विरोधी पक्षांचे राष्ट्रीय नेते येणार आहेत. राहुल गांधीदेखील यावेळी उपस्थित असतील. त्या निमित्ताने १ सप्टेंबर रोजी प्रदेश काँग्रेस तसेच मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे टिळक भवन येथे राहुल गांधींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साह संचारणार आहे. मात्र टिळक भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी मर्यादित पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

साधारणपणे ५०० ते ८०० पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला हजेरी लावता येणार नसल्याने सध्या मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. टिळक भवनाऐवजी मुंबईतील इतर सभागृहात या कार्यक्रम आयोजित केला असता तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना हजेरी लावता आली असती, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. दरम्यान, सोहळयात सहभागी होता यावे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी वशिला लावण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in