

मुंबई : विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप करत आठ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा दावा करत राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात कुलाबा प्रभागातील इच्छुक उमेदवार बबन महाडिक यांच्यासह अन्य सात जणांनी याचिका दाखल केली आहे.
निवडणुकीपूर्वी याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, अशी विनंती याचिकाकार्त्यांनी न्यायालायला केली. मात्र मात्र मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळत निश्चित केल्याप्रमाणे २१ जानेवारीला सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ या तीन प्रभागांतून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले. ते अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हे आपल्या कुटुंबीयांसह तेथे हजर होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना मनसेचे बबन महाडिक, नीरज राठोड, वैशाली गावडे यांच्यासह ८ जणांनी ॲड. आशिष गायकवाड व ॲड. अनिरुद्ध रोटे याच्यामार्फत याचिका दाखल केली.
याचिकाकर्ते, इतर अनेक अपक्ष उमेदवारांनी प्रभाग क्रमांक २२४ ते २२७ साठी आवश्यक कागदपत्रे आणि अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. परंतु नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर अर्ज स्वीकारू नयेत यासाठी दबाव आणला. नार्वेकर विधानसभाध्यक्ष या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असतानाही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावले. अखेरच्या दिवशी फॉर्म भरण्यापासून रोखल्याचा अन्य उमेदवारांनी आरोप केला आहे. या उमेदवारांनी केलेल्या तक्रारींकडे राज्य निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची चौकशी करत, घटनेचे फुटेज, साक्षीदारांचे जबाब नोंदवून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती याचिकेत केली आहे.
काँग्रेसचे प्रमोद नार्वेकर यांना धमकी
काँग्रेसचे उमेदवार प्रमोद नार्वेकर यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद नार्वेकर हे प्रभाग क्रमांक ८७ मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. बुधवारी रात्री, आपला निवडणूक प्रचार संपवून नार्वेकर सांताक्रूझ पूर्व येथील गोळीबार नाका परिसरातील आपल्या कार्यालयात गेले होते. एका व्यक्तीने कार्यालयात घुसत नार्वेकरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, अशी तक्रार दाखल झाली आहे.