रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी, कितीही पाऊस पडला तरी लोकल थांबणार नसल्याचा रेल्वेचा दावा

मायक्रो-टनलिंकमध्ये रुळांच्या 2-3 मीटर खाली मिनी ड्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.
रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी, कितीही पाऊस पडला तरी लोकल थांबणार नसल्याचा रेल्वेचा दावा
Published on

राज्यात मान्सून सक्रिय व्हायला अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की पटरीवर पाणी साचते आणि रेल्वेचा खोळंबा होतो. या वर्षी 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यापूर्वी सरकारी यंत्रणा आणि रेल्वे कामाला लागली आहे. यंदा पावसाळ्यात कितीही मुसळधार पाऊस पडला तरी मुंबई शहर आणि उपनगरात लोकल आणि रेल्वेचा खोळंबा होणार नाही, असा दावा रेल्वेने केला आहे.

2021 साली मुसळधार पाऊस पडल्याने पटरीवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून 7 दिवस रेल्वेचा खोळंबा झाला होता. यावेळी सायन, परेल, माटुंगा रोड, चर्नी रोड आणि ग्रॅंट रोड या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रेल्वे खोळंबली होती. मात्र या वर्षी अशी परिस्थिती उद्भवणार नसल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे. कारण रेल्वेकडून यंदा मान्सूनपूर्व तयारी करण्यात आली आहे. मायक्रो-टनलिंकमध्ये रुळांच्या 2-3 मीटर खाली मिनी ड्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.

पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होऊ नये यासाठी पुर्ण तयारी केली आहे. दिवा-कळवा, विक्रोळी-कांजूरमार्ग आणि सायन-कुर्ला स्टेशनवर मायक्रो टनलिंकचं काम करण्यात आलं आहे. तसंच मायक्रो-टनलिंकशिवाय आणखी पंप लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर नाले सफाई, झाडांची कापणी, रुळांची उंची वाढवणं, ढिगारे हटवणे अशी कामे देखील करण्यात आली आहेत. हे सर्व उपायांसोबत रेल्वेकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हे नियंत्रणक्ष 24 तास सुरु असणार आहे.

पाणी साचून लोकलचा खोळंबा होऊ नये म्हणून 24 ठिकाणी 166 पंप उपलब्ध करण्यात आले असून मुख्य मार्गावर 8 ठिकाणी मायक्रो-टनलिंक करण्यात आली आहे. याबरोबरच उपनगरीय मार्गावर 118.48 किमी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in