![मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांत मुसळधार बरसणार](http://media.assettype.com/freepressjournal-marathi%2F2024-07%2Fb31b231d-a578-4d9f-8620-3e3337697b5e%2Fin_pune_rain_0__1_.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : मुंबईसह राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्यात पाऊस ही कसर भरून काढेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणीत जोरदार पाऊस होईल, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने जुलै महिना हा पावसाचा असेल, असा अंदाज यापूर्वीच वर्तवला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०६ टक्क्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.