
मुंबईत दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दमदार हजेरी लावली असून सकाळी कार्यालयात निघालेल्या अनेकांची तारांबळ उडाली. मात्र दडी मारलेल्या पावसाच्या हजेरीने मुंबईकर सुखावले. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे ४१.४ मिमी, तर कुलाबा येथे ३३.२ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकणातही पाऊसधारा बरसू लागल्या असून शेतकऱ्यांचे चेहरे उजळले आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने ३० जून रोजी राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा दिला आहे. तर, ठाणे, मुंबई, रायगडसह विदर्भात ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे.