
सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली. कदाचित याच पार्श्वभूमीमवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना चांगलाच दम भरला आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रामध्ये, संबंधित नेत्यांच्या परवानगी शिवाय माध्यमांसमोर न बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जर या आदेशाचे उल्लंघन झाले तर पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 'माध्यमांशी बोलून किंवा सोशल मीडियावर बोलून प्रसिद्धी मिळवायची हौस असेल, तर आधी पदाचा राजीनामा द्या,' अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर पत्र पोस्ट करत त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, "सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, असे करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येते. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्सने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचे काय करावे, हे त्यांनी ठरवावे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे खपवून घेतले जाणार नाही." असा दम भरला आहे.
पुढे ते म्हणाले आहेत की, "माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही मत मांडायचे असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, किंवा माझ्याशी बोला. पण हे सोडून थेट माध्यमांशी बोलायचे असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या. त्यानंतर काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या." या शब्दांत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सज्जड दम भरला.