
मुंबई : लहानग्यांसह मोठ्यांच्या पसंतीस उतरणारी राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे यंदाच्या वर्षात पर्यटकांनी काही अंशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. २०२४-२५ या वर्षात पर्यटकांमध्ये घट झाली असून केवळ २३ लाख ५७ हजार पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली आहे. त्यातून पालिकेला केवळ ९.१८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, २०२३-२४ मध्ये २८ लाख पर्यटकांनी राणी बागेला भेट देऊन ११.४६ कोटींचा महसूल पालिकेला दिला होता.
दरवर्षी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात राणी बागेच्या महसुलातूनही बऱ्यापैकी भर पडते. त्यामुळे राणी बाग प्रशासन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याच्या प्रयत्नात असते. परंतु, या बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या भेटीचा २०१९ ते २०२५ या वर्षांचा आढावा घेतल्यास २०२२-२३ या वर्षात सर्वात जास्त पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयास भेट दिली होती. या वर्षात पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त झाला होता.