वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तिसरा बॉम्ब टाकला आहे. वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरभरती होत आहे. पण मुंबईतील या प्रकल्पासाठी राज्यात मुलाखती न घेता चेन्नईमध्ये ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ होणार आहेत. देशभरातून नोकरीची स्वप्न घेऊन तरुण-तरुणी महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रातील सुशिक्षितांना या नोकरभतीमध्ये संधी का नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रोजगाराच्या संधी हिरावून सरकारकडून महाराष्ट्रातील तरुणांचे खच्चीकरण होत असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात येणारा वेदांत-फॉक्सकॉन आणि रायगडमधील बल्क ड्रग पार्क दुस-या राज्याने पळवल्याची टीका आधीच आदित्य ठाकरे यांनी केली होती. आता मुंबईतल्या वर्सोवा वांदे सी लिंकच्या प्रकल्पासाठी नोकरभरती चेन्नईत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वेदांता-फाॅक्सकाॅन व बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला याचे सरकारकडून अजूनही अधिकृत उत्तर आलेले नाही. हे दोन्ही प्रकल्प हातातून निघून गेल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. ते महाराष्ट्र राज्यासाठी गेले आहेत की स्वतःसाठी गेले आहेत हे आम्हाला माहिती नाही. पण आता तरी मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी होणाऱ्या नोकरभरतीकडे लक्ष द्यावे, कारण एमएसआरडीसी खाते गेली सात वर्षे एकनाथ शिंदेंकडे होते.