
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'शक्ती' चक्रीवादळाने महाराष्ट्रातील हवामानावर गंभीर परिणाम होणार आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस, ताशी ४०-५० किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ 'शक्ती'मुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशात जोरदार पाऊस पडेल, तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव दिसेल. रायगड जिल्ह्यात १८ मेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे, जो मान्सूनच्या आगमनापर्यंत कायम राहणार आहे.
हवामान अभ्यासकांनी सांगितले की, १५ ते २२ मेदरम्यान पावसाचा जोर वाढेल. अरबी समुद्र आणि तेलंगणा येथील वाऱ्यांच्या चक्राकार गतीमुळे वळवाच्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत होईल.