बीबीडी चाळीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने तेथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे. मुंबईत बीआयटी चाळी असून, त्या १०० वर्षे जुन्या झाल्या आहेत. धोकादायक स्थितीत असलेल्या बीआयटी चाळीचा पुनर्विकास बीडीडी चाळीच्या धर्तीवर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मुंबईत येणाऱ्यांना छत मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेने बीआयटी चाळी बांधल्या आहेत. या चाळीत चार ते पाच हजार कुटुंबे राहत असून, चाळी धोकादायक झाल्याने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्य सरकारने बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याचे जाहीर केले आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाल्यानंतर तेथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या बीआयटी चाळी असून, त्या चाळींचा पुनर्विकास करण्याची मागणी शिवसेनेचे उपनेते मनोज जामसुतकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
वरळी, नायगाव व डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, सध्या या चाळींचा पुनर्विकास म्हाडातर्फे केला जाणार आहे.