कोरोनाचा दिलासा; ९० टक्के बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले आहे
कोरोनाचा दिलासा; ९० टक्के बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

मे महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फैलाव झाल्यानंतर गणेशोत्सवात उद्रेक होईल, असा इशारा टास्क फोर्सने दिला होता; मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे चौथ्या लाटेवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने कोरोना हद्दपार झाला आहे. मुंबईत सद्यस्थितीत एकूण ७९५ बाधितांमधील ७१७ म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर केवळ तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले आहे; मात्र जूनअखेर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढ सुरू झाली होती. मे महिन्यात १२५ पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये थेट दीड हजारांवर गेल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते. १५ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत तब्बल ९ हजार ४९५ रुग्ण वाढले होते; मात्र गणेशोत्सवानंतर मुंबईतील रुग्णवाढ थांबल्याने दिलासा-दायक चित्र निर्माण झाले आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी ८ हजार दिवसांवर

गणेशोत्सवाच्या सुरुवातीला झालेल्या रुग्णवाढीमुळे २८ सप्टेंबरदरम्यान सात हजार दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी थेट ९८८ दिवसांवर आला होता. मात्र आता रुग्ण दुपटीचा कालावधी ८ हजार ४६८ दिलसांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत सुमारे पाच हजारांवर चाचण्या होत असताना शंभरहून कमी रुग्ण आढळत आहेत. मुंबईत ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या ३ हजार ३७० कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील ३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in