

मुंबई : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ आनंद नाडकर्णी यांनी शुक्रवारी पहाटे वयाच्या ६८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘गद्दे पंचविशी’, ‘वैद्यक सत्ता’ यासह ‘शहाण्यांचा सायकिएट्रिस्ट’, ‘मनमैत्रीच्या प्रदेशात’ अशी विचार करण्यास प्रवृत्त करणारी सुमारे २७ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. नाट्य क्षेत्रात ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘रंग माझा वेगळा’ ही त्यांची नाटकेही रसिकप्रिय झाली. उत्तम मनोविकारतज्ज्ञ, ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
डॉ आनंद नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदव्युत्तर शिक्षण घेतले. ठाण्यातील 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (आयपीएच) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. 'सांघिक उपचार' ही संकल्पना त्यांनी रुजवली. ‘आयपीएच’ आणि ‘मुक्तांगण’ डी-अॅडिक्शन सेंटरचे ते संस्थापक होते.
गेल्या काही काळापासून ते आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपुरी पडली आणि वयाच्या ६८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. लेखिका वीणा गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, अनेक पत्रकारांनी फेसबुकच्या माध्यमातून डॉ. नाडकर्णी यांना आदरांजली वाहिली आहे.