
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या पतधोरणविषयक समितीची (एमपीसी) तीन दिवसांची बैठक सोमवारपासून (६ जून) सुरू झाली. या बैठकीतही रिझर्व्ह बँक रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दर दोन महिन्यांनी होणारी ही तीन दिवसीय बैठक गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ८ जून रोजी बैठक संपणार असून त्यानंतर या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली जाईल.
याआधी गेल्या मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने तातडीची बैठक घेऊन रेपो दरात ०.४० टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या आरबीआयने रेपो दर चार टक्क्यांवरून ४.४० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्ज ते कार कर्ज महाग झाले आहे.