महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्या जागी आता रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी केलेल्या विधानांवरून अनेक वाद निर्माण झाले. यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली होती. यानंतर अखेर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपालपदी काम पाहिले होते. तसेच, २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले. सलग ७ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे.