

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला महापौर झाल्या आहेत. १९५५-५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर झाल्या होत्या. त्यानंतर १९९४-९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महापौर झाल्या आहेत.
विशेष म्हणजे १९९७-९८ पासून ते २०२२ या कालावधीत शिवसेनेच्या (अखंड) सलग पाच महिला महापौर झाल्या आहेत. तर २०२६ मध्ये महापौरपदासाठी खुला वर्ग महिला आरक्षण असल्याने भाजपच्या रितू तावडे यांना महापौरपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांची महापौरपदी बिनविरोध होणार आहे.
रितू तावडे भाजपच्या पहिल्या महापौर होणार असून महापालिकेच्या इतिहासात त्या आठव्या महिला महापौर आहेत.
महापालिकेत महापौरांना काही मर्यादित अधिकार असल्याने त्या आर्थिक बाबींशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देऊ शकतात. महापौर शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांच्या नावांची शिफारस करू शकतात.
आणखी काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार महापौरांना आहेत. त्यामुळे महापौर पद हे प्रतिष्ठेचे आहे. मुंबई महापालिकेत १९९७ पासून सलग २६ वर्षे शिवसेनेचे महापौर होते.
विशेष म्हणजे १९५५ पासून ते आजपर्यंत मुंबईत ज्या सात महिला महापौर झाल्या आहेत, त्यामध्ये शिवसेनेच्या पाच महिला महापौरांचा समावेश आहे.
आतापर्यंतच्या महिला महापौर
१९५५ - ५६ : सुलोचना मोदी
१९९४ - ९५ : अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
१९९७ - ९८ : विशाखा राऊत
२००७ - ०९ : डॉ. शुभा राऊळ
२००९ - १२ : श्रद्धा जाधव
२०१४ - १७ : स्नेहल आंबेकर
२०१९ - २२ : किशोरी पेडणेकर
२०२६ : रितू तावडे