चारूल शाह जोशी / मुंबई
सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना त्यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची परवानगी दिली आहे, मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर प्रवास करता येणार नाही, अशी अटही घातली आहे.
उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली २०१६ मध्ये वाकोला पोलीस ठाण्याने तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अलीकडेच सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे.
२९ जुलै २०१६ रोजी रितू तावडे या सहा जणांसह वाकोला येथील महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमिक शाळेत गेल्या होत्या. कर्करोग त्रस्त शिक्षिकेच्या अचानक झालेल्या बदलीचा निषेध करण्यासाठी ते सर्वजण शाळेत गेले होते.
यावेळी झालेल्या संवादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. असा दावा केला जात आहे की, या गटाने व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि दोन शिक्षकांना मारहाणही केली. शाळेच्या व्यवस्थापनाने पुढे ११ ऑगस्ट २०१६ रोजी वकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शाळा व्यवस्थापनाने अवाजवी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर केला, असा दावा करत तावडे यांनी दोषमुक्त करण्याची मागणी केली होती.
परदेशी प्रवासास मनाई
विशेष सरकारी वकील इक्बाल सोळकर यांनी पासपोर्ट नूतनीकरणाला कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ‘त्यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. पासपोर्टच्या नूतनीकरणामुळे या खटल्याच्या सुनावणीत कोणताही अडथळा येणार नाही,’ असे सांगत न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर केली. मात्र, न्यायालयाने एक अट घातली आहे ज्यानुसार त्यांना न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय परदेश प्रवास न करण्यास सांगण्यात आले आहे.