
मुंबई : मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सुलभरीत्या आणि निर्बंधमुक्त मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नियमित कारवाईसोबतच विशेष मोहीमसुद्धा हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे तसेच वाहतूक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यात अडथळा ठरणाऱ्या बाबींचे तात्काळ निष्कासन केले जात आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांलगतचे परिसर पादचाऱ्यांच्या मार्गक्रमणासाठी सुलभ ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची व्हावी, पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, रस्त्यांची स्वच्छता, फेरीवालामुक्त परिसर आदी बाबींचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांना सुलभरीत्या मार्गक्रमण करता यावे, या हेतूने नियमित कारवाईसोबत विशेष मोहीमसुद्धा हाती घेण्यात आली आहे.
याच अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी परिरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, परवाना, अतिक्रमण निर्मूलन, इमारत प्रस्ताव, आरोग्य, आस्थापना, पाणीपुरवठा आदी विभागांचे पथक बनविण्यात आले आहे. परिसर स्वच्छता, पदपथांवरील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत फेरीवाले हटवणे, बेवारस वाहने हटवणे, प्रतिबंधित प्लास्टिक बॅग बाळगणाऱ्यांवर कारवाई आदी बाबी या पथकाने हाती घेतलेल्या संयुक्त मोहिमेत करण्यात आल्या.