
मुंबईसारख्या व्यापक शहरात अनेक जण स्वप्न उराशी बाळगून येतात. शहराच्या आकर्षणापोटी घरातून पळून येण्याचा, तर वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबापासून विभक्त होण्याचा अथवा मुंबईसारख्या व्यापक शहरात हरवण्याचे प्रकार घडतात. अशा हरवलेल्या मुलांना अथवा पळून येण्याचा घटनांतील पीडित मुलामुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी 'आरपीएफ'द्वारे संपूर्ण देशभरात 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत मागील चार महिन्यांत ५०२ मुलामुलींची सुटका रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)कडून कारण्यात आली आहे.
यामध्ये ३३० मुलांचा तर १७४ मुलींची समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी यापैकी काहींना विविध ठिकाणामधून सोडवून त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे, तर काहींना लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द केले असल्याची माहिती रेल्वे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अनेक मुले-मुली लहान वयातच आपल्या कुटुंबाशी नाळ तोडून मुंबईत दाखल होतात; मात्र यावेळी शिक्षणाचा अभाव, लहान वय आणि भल्यामोठ्या मुंबई शहरात ओळखी पाळखीचे कोणी नसल्याने ही लहान मुले-मुली रेल्वे स्थानकांवर आपले आयुष्य व्यतीत करतात; परंतु याचवेळी ही मुले चुकीच्या मार्गावर जाण्याचा घटना सर्वाधिक घडतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ)संपूर्ण देशभरात 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहीम हाती घेतली. यामध्ये घर सोडून पळून आलेली मुले रेल्वे स्थानकांवर आढळल्यास त्यांची चौकशी केली जाते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची माहिती माहिती गोळा केली जाते. त्यानंतर त्यांना रेल्वे पोलीस आणि सामाजिक संस्था संयुक्त होत घरी पाठवण्याचे प्रयत्न करतात.
सुटका करण्यात आलेल्या मुलामुलींची आकडेवारी :
जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ : ६५५
सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ : १०४५
जानेवारी ते एप्रिल २०२२ : ५०२
विभागनिहाय सुटका झालेल्या मुलामुलींची संख्या
मुंबई - २८५
पुणे - ७१
भुसावळ - ९२
नागपूर - ३२
सोलापूर - २४