समीर वानखेडेंना तूर्तास दिलासा; २५ कोटींचे खंडणी प्रकरण

या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली.
Sameer Wankhede
Sameer Wankhede

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानकडून २५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने २० फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करणार नसल्याची हमी दिली आहे. याची दखल घेत न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ईडीने कोणतीही कारवाई करू नये. इतकेच नव्हे तर ईडीने नोंदवलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणी करत समीर वानखेडे यांच्या वतीने ॲड. करण जैन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. संदेश पाटील यांनी वानखेडे यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग केल्याने त्यांनी तिथल्या कोर्टात दाद मागावी, अशी भूमिका घेतली. यावेळी वानखेडे यांच्या वतीने आबाद पोंडा यांनी जोरदार आक्षेप घेतला. आयआरएस अधिकाऱ्याने सीबीआयच्या भ्रष्टाचार आणि खंडणी प्रकरणाच्या विरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा त्यांना मुंबई न्यायालयात जाण्यास सांगितले, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. परंतु न्यायालयाच्या कामाकाजामुळे २० फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेणे शक्य नाही. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. पाटील यांनी २० फेब्रुवारीपर्यंत वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, अशी हमी दिली.

logo
marathi.freepressjournal.in