
पत्राचाळ प्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले संजय राऊत (Sanjay Raut) अखेर जामिनावर बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. जनतेशी संवाद साधताना त्यांनी म्हंटले की, लवकरच त्यांना कळेल की मला तुरुंगात टाकून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. मी १०३ दिवस तुरुंगामध्ये होतो, आता आपले १०३ आमदार निवडून येणार. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, "गेल्या ३-४ महिन्यांमध्ये शिवसेना नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण बाळासाहेबांची शिवसेना तुटली नाही. अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयाने मशाल भडकली आहे. या राज्यात उद्धव ठाकरेंचीच शिवसेना राहणार आहे. आता त्यांना कळेल की, मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक असेल तर ती म्हणजे माझी अटक. आज न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मला कितीवेळाही अटक करा, पण मी शिवसेनेला त्यागणार नाही. मी भगवा घेऊनच जन्माला आलो आहे, या भगव्याबरोबरच जाणार आहे."
"मी तुरुंगात असतानाही पेक्षाचाच विचार करत होतो. माझे आयुष्य हे पक्षासाठीच आहे. मला चिरडणे किंवा संपवणे इतके सोपे नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले रसायन आहे. मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता आपले १०३ आमदार निवडून येतील." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.