
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जामिनावर आता आभार आले आहेत. यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray)भेट घेतली. गेटजवळ येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी शिवसैनिकही भावुक झाले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हंटले की, "संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि अजूनही लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही." संजय राऊतांना पुन्हा खोट्या प्रकरणात अडकवलं जाऊ शकत, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.
"केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यासारख्या वागत आहेत. संपूर्ण देश हे सगळं बघत आहे. न्यायदेवता आपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय अशी भीती आहे. सर्वसामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असते. आणि न्यायालय आपल्या आधी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर सगळ्यांनी विरोध करायला हवा. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले." अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.