
अगदी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाशी युती केली. असे असतानाही प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले की, शरद पवार हे अजूनही भाजपचे नेते आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही." असे स्पष्ट केले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील २ प्रमुख पक्ष आहेत. तर शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील एक मोठे नेते आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेले विधान आम्हाला मान्य नाही. जर ते भाजप नेते असते, तर त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार होऊन दिले नसते. शरद पवारांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आजसुद्धा देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा विचार करतो, तेव्हा सर्वजण शरद पवारांचे नाव घेतात. कारण सर्व विरोधी पक्षांना तेच एकत्र आणू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावे," असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला आहे.