संजय राऊत यांच्या जामिनावर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी

जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मनी लाँण्ड्रिग अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली
संजय राऊत यांच्या जामिनावर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी
Published on

पत्राचाळ घोटाळ्याचे मास्टरमांईड असल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाची सत्र न्यायालयाने दखल घेतली असून विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) भूमिका मांडण्याचे निर्देश देवून अर्जाची सुनावणी १६ सप्टेंबरला निश्चित केली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मनी लाँण्ड्रिग अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली. ईडी कोठडी संपुष्टात आल्यानंतर अखेर राऊतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या राऊत यांनी बुधवारी अॅड. विक्रांत साबणे यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर तातडीने सुनावणी झाली.

यावेळी राऊत यांच्या वतीने ईडीचा तपास पूर्ण झाला असून महिन्याच्या शेवटी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असल्याने अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली, तर या अर्जाला ईडीच्या वतीने विशेष सरकारी वकील कविता पाटील यांनी विरोध करत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने येत्या आठवड्यात अन्य काही महत्वाचे खटले असल्यामुळे पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी शक्य नाही, असे स्पष्ट करत ईडीला १६सप्टेंबरपर्यंत भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in