

मुंबई : मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी, मनसेच्या वतीने शनिवारी फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत "सत्याचा मोर्चा" काढण्यात आला. मोर्चासाठी हजारोच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते लोकल ट्रेनने फॅशन स्ट्रीट परिसरात जमा झाले. विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास करत मोर्चाचे ठिकाण गाठले. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सीएसएमटी, चर्चगेट स्थानक परिसर घोषणांनी दणाणून गेला.
मोर्चेकरांच्या गर्दीने फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमा परिसरात प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. मतदार चोरी थांबा, बोगस मतदारांचं बोगस रूप उघड करण्यासाठी सत्याचा मोर्चा, लोकशाही वाचवा संविधान वाचवा, ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे, असे विविध आशयाचे बॅनर हाती घेतलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते. अडीच वाजण्याच्या सुमारास मोर्चा मेट्रो सिनेमापासून महापालिका मुख्यालयाच्या दिशेने सुरु झाला.
ठिणगी बघताय, वणवा पेटेल - उद्धव ठाकरे
बोगस मतदान, मत चोरी, मतदार यादीतील घोळ या विरोधात सत्ताधारी सोडून सगळे विरोधक एकत्र आले आहेत. मतचोरीविरोधातील लढा सुरू असून आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी जागे झाले पाहिजे. ज्या ठिकाणी मतचोर दिसेल त्याठिकाणी त्याला लोकशाही पद्धतीने फटका. भाजपसह महायुतीने ठिणगी बघितली पण वणवा कधीही पेटेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला. महाविकास आघाडीसह मनसेने आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चा त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आयोजित सभेत ठाकरे बंधू एकत्र आले, यावेळी ठाकरे बंधूनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
सत्तेचा गैरवापर - पवार
सत्तेत राहण्यासाठी सत्तेचा गैरवापर होतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मतचोरीविरोधात राज्यातील जनता एकत्र आली तसेच मतांचा अधिकार व लोकशाहीतील अधिकार वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला यावेळी केले. सत्याचा मोर्चा मविआच्या वतीने आयोजित मोर्चात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, ते बघता लोकशाहीला धक्का बसला आहे. मत चोरी विरोधात लढा देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो ती एकजूट जबरदस्त आहे, असे पवार म्हणाले.
मतदार याद्या दुरुस्त करा - बाळासाहेब थोरात
सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. निवडणुकीत मतचोरी झाली आहे हे राहुल गाधी यांनी समोर आणल्याचे थोरात म्हणाले.
... तरच यशापयश मान्य करू - राज
भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे लोकही मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत. मग निवडणूक घ्यायची घाई का आहे, असा सवाल करत मतदार याद्या पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतरच निवडणुकीत यश कोणाचे अपयश कुणाचे हे मान्य करू, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला दिले. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सत्याचा मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा मतदार यादीतील गोंधळावर पुन्हा निशाणा साधला. ठाकरे म्हणाले की, आजचा मोर्चा राग, ताकद दाखविण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. माझ्यासह देशातील अनेकांनी या विषयावर भाष्य केले आहे. तोच विषय नव्याने सांगण्यासारखे काहीच नाही.