“प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नसते. सध्या बाहेर जे चालले आहे ते मी पाहतो आणि ऐकतो आहे. मी फार कमी बोलतो; पण एक लक्षात ठेवा की, जे बोलत आहेत, त्यांच्यापेक्षा मी चौपट बोलू शकतो. सगळ्यांचा कच्चा-चिठ्ठा माझ्याकडे आहे. मी संवेदनशील माणूस आहे; पण माझ्या संयमालाही मर्यादा आहेत. ती वेळ माझ्यावर आणू नका. माझ्या संयमाची परिसीमा पाहू नका,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले. “मुख्यमंत्रिपद माझ्या डोक्यात गेलेले नाही. मी जमिनीवर काम करणारा माणूस आहे. मी इशारा म्हणून हे बोलत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षातर्फे उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हा तिथेही पूर परिस्थिती होती. आम्ही संवेदनशीलता दाखवून ५० लाखांची मदत तत्काळ दिली.
पहाटे ३ पर्यंत काम करतो
“मी, पहाटे तीन-साडेतीन वाजेपर्यंत काम करत असतो. आजदेखील पहाटे साडेतीनपर्यंत लोकांना भेटत होतो. सकाळी ७ वाजता ब्रिफिंग घेतले. असा पहाटे ३पर्यंत उपलब्ध असणारा मुख्यमंत्री पाहिलाय का?” असा सवालही शिंदे यांनी केला.