विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरु

विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरु

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर मंगळवारी हा प्रकार घडला आहे

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू असतानाच विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुभाष भानूदास देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव अलून गंभीर भाजलेल्या सुभाष यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर मंगळवारी हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधीमंडळात भाषण सुरू असतानाच शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रकार केल्याची घटना घडली. दुसरीकडे, या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला धारेवर धरले.

गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी आणि घोषणाबाजीने अधिवेशन चांगलेच गाजत आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून विधानभवनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाईची मागणीही त्यांनी केली आहे.

मंत्रालयाच्या छतावरही ‘शोले स्टाइल’ आंदोलन

मंत्रालयाच्या छतावर चढून एकाने ‘शोले स्टाइल’ आंदोलन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुपपणे खाली उतरवले. याप्रकरणी त्याची चाैकशी करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in