
मुंबईत १३ जूनपासून शाळा सुरू होताच स्कूलबस चालकांनी पहिल्याच दिवशी पालकांना मोठा झटका दिला आहे. स्कूलबसच्या भाड्यात त्यांनी २० टक्के वाढ केली आहे. वाढलेले इंधनदर व अन्य कारणांमुळे ही दरवाढ करावी लागल्याचे स्कूलबस चालक संघटनेचे म्हणणे आहे.
स्कूलबस मालक संघटनेचे प्रतिनिधी रमेश मनियन म्हणाले की, “स्कूलबस चालकांनी २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. शाळेचा परिसर व शाळेचे ठिकाण आदी बाबी पाहून ही दरवाढ केली आहे. इंधनाची दरवाढ, चालक व अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचे वाढलेले खर्च, आरटीओ शुल्क, वाहतूक दंड आदींमुळे ही दरवाढ करावी लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमचा व्यवसाय बंद आहे. चालक व अन्य कर्मचारी, क्लीनर, महिला मदतनीस आदींच्या वेतनात वाढ झाली आहे,” असे ते म्हणाले.
मनियन पुढे म्हणाले की, “भारतात स्कूलबस १५ वर्षे चालवता येते. मुंबईत ती केवळ आठ वर्षे चालवता येते. सरकारने आम्हाला जुन्या बसेस चालवायला आणखी दोन वर्षे परवानगी द्यावी. कारण महासाथीच्या काळात दोन वर्षे बस वापरल्या गेल्या नाहीत. सरकारने आमची मागणी मान्य केल्यास पालक व विद्यार्थ्यांवर बोजा येणार नाही.”