
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्ज केल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या अर्जाची दखल घेत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यसभा निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात उतरले असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना, तर भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. येत्या १० जूनला होणार्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातच मविआचे दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या कारागृहात असल्याने त्यांचाही मतांचा लाभ घेण्याचा मविआचा मानस आहे. त्यासाठी सुरुवातीला शुक्रवारी अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात मतदान बजावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही अर्ज दाखल केला.
त्या अर्जावर सोमवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मलिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यासाठी त्यांना काही तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखालील रुग्णवाहिनीतून विधान भवनात नेण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मलिक निवडणुकीत मतदान करू शकतील आणि मतदानानंतर रुग्णालयात परत येतील.
असे स्पष्ट केले. तसेच वैद्यकीय आणि पोलीस एस्कॉर्टचा खर्च मलिकच उचलतील, असे आश्वासनही न्यायालयाला देण्यात आले.