
मुंबई : मुंबई शहर व उपनगराच्या वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषणच्या ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर बसविण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) १७ दिवसांत पूर्ण केले आहे.
५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत काम पूर्ण झाले. यामुळे दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावाॅटऐवजी ४ हजार २०० मेगावाॅट विजेचे वहन शक्य होईल.
महापारेषणच्या ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र.१ या वाहिनीचे यापूर्वीच २७ कि.मी.चे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ कि.मी.चे काम महापारेषणने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. वाहिनीच्या कामात रेल्वे, हायवे व उच्च विद्युत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती. या अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतिशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ कि.मी.चे वरील काम तातडीने पूर्ण केले. या कामामुळे ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-१ च्या क्षमतेत आमूलाग्र बदल होऊन पूर्वीच्या १००० मेगावाॅटऐवजी २१०० मेगावाॅट पर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे.