मुंबई : मुंबईत रविवारी झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी बनवलेली २२०० पदके चोरणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. बॉम्बे जिमखान्याच्या ग्राऊंडमध्ये तयार केलेल्या तंबूत ही पदके ठेवली होती. रविवारी ही पदके चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली. आझाद मैदान पोलिसांनी सांगितले की, या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना ही पदके दिली जाणार होती. मात्र, पदके चोरीला गेल्याचे कळताच संयोजकांनी तात्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विघ्नेश पांडे-तेवार,
नासिर अब्दुल शेख, पिरामल बालन गौंडर, गौतम साळुंखे, रोहित विजय सिंह, आमीर रफीक शेख यांना अटक केली. पहाटे ३ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. ही पदके १६२ बॉक्समध्ये ठेवली होती. त्यातील २२ बॉक्सची चोरी झाली. त्यात २२०० पदके होती. अटक केलेल्या व्यक्ती बहुतांशी कामगार आहेत. चोरी केलेल्या पदकांची किंमत १.३८ लाख रुपये आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.