महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय संकट सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या चौकशीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही.
याचिकेत उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी रश्मी, शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना पक्षकार करण्यात आले आहे. सोमय्या यांच्या याचिकेनुसार ही मालमत्ता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी मिळून रायगडमधील मुरुड तालुक्यातून खरेदी केली होती.
या मालमत्तेची पर्यावरण मंत्रालयाकडूनही चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्याने केली आहे. याशिवाय, त्यांनी अलिबागमधील मालमत्तेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित ‘बेकायदेशीर’ कृत्यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.