अमली पदार्थ सेवनविरोधात महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती; जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याशी खास बातचीत

नशा करणाऱ्यांवर, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे
अमली पदार्थ सेवनविरोधात महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती; जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याशी खास बातचीत

तुमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान काय आहे असे तुम्ही मानता?

कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. माझ्याकडे ज्या काही तक्रारी येतात, त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो.

गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी तुमचे विशेष प्रयत्न?

एखादी घटना घडताच आम्ही पूर्ण एकाग्रतेने गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतो आणि त्याला पकडण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तसेच नियमित कोम्बिंग ऑपरेशन्समुळे आम्ही अलीकडेच मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यापुढील काळातही पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे. याबाबत मी तपास पथकातील माझ्या सहकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत आणि त्यांना वेळोवेळी मी प्रोत्साहित करीत असतो.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तसेच नशेखोरांवर पोलिसांची कारवाई होऊनही सातत्याने या घटना घडत आहेत ही चिंतेची बाब नाही का?

नशा करणाऱ्यांवर, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे; मात्र असे असतानाही त्यांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब नक्कीच आहे. यासाठी आम्ही आमची टीम पाठवून परिसरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून अमली पदार्थांचे सेवन करू नका, असे सांगत आहोत. नशा बंदीसाठी आम्ही जनजागृती मोहिमा राबवत आहोत आणि अमली पदार्थ सेवन करणारे आत्महत्येच्या दलदलीत अडकू नयेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत.

मुंबई महानगरातील सर्वात लोकप्रिय महाविद्यालय तुमच्या विभागात आहे, त्यांच्यासाठी काही विशेष प्रयत्न?

सगळी मुलं सारखीच असतात, किशोर वयात मुलांची दिशाभूल होते, हा त्यांचा दोष नसतो, लहान वयातच आकर्षण असते आणि त्यामुळे ते फसतात. अशा मुलांच्या सुधारणांसाठी पोलीस विशेष प्रयत्न करत आहेत. निर्भयाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ही मुले हे आपलं भविष्य आहेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल असावे, हाच पोलिसांचा मानस आहे.

जनता आणि पोलीस यांच्यातील समन्वयाबाबत काही ठोस उपाययोजना?

जुहू पोलीस ठाण्यात सुमारे ६० जणांची मोहल्ला समिती असून, आम्ही त्यांना वेळोवेळी समन्वयासाठी बोलावून त्यांची मदत घेतो. मला समाधान आहे की, मोहल्ला कमिटी खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे जनतेत सकारात्मक संदेश जात आहे.

पोलीस सेवेतील लीगमधून काय करायचे आहे?

आम्ही पोलीस गणवेशात राहून जनतेसाठी जे काही करत आहोत, राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहोत, ते भविष्यातही समर्पित भावनेने करत राहू.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आव्हाने?

ग्रामीण भागात काम करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असले, तरी शहरातील लोक हुशार आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी आम्ही आमचे कर्तव्य बजावू. लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग जे काही निर्देश देईल, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

सुनील दत्ताराम जाधव. बृहन्मुंबई पोलीस खात्यातील एक सुपरिचित पोलीस अधिकारी. जुहू पोलीस ठाण्यात ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. सुनील जाधव आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. ते जुहू पोलीस ठाण्यातील क्षेत्रात अमली पदार्थ सेवनविरोधात तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम राबवत आहेत. दै. 'नवशक्ति'चे कौशल विनोद पाठक यांनी नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दत्ताराम जाधव यांची भेट घेत खास बातचीत केली. या विशेष भेटीतील हा संवाद.

logo
marathi.freepressjournal.in