
गणेशोत्सवाला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला; परंतु चाकरमान्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर नियोजित २५०० बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. अखेर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता महामंडळाने एसटीच्या ६०० ते ७०० जादा गाड्या इतर जिल्ह्यातील विभागातून मागवल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीत या गाड्या कोकणात रवाना होतील. तर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील.