विद्यार्थ्यांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार

खाजगी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध केला आहे
विद्यार्थ्यांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता खाजगी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध केला आहे. त्यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्मार्टकार्ड तसेच मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करुन दिली आहे. परंतु खाजगी शाळांच्या विद्यार्थ्याकरिता अशा प्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार खाजगी शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता इयत्ता ५ वीपर्यंत २०० रुपये, इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत २५० रुपये आणि इयत्ता ११ वी १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता ३५० रुपये इतक्या सवलतीच्या दरामध्ये नवीन बसपास योजनेअंतर्गत (वातानुकूलित / विना वातानुकूलित) सुविधा बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात येत आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन म्हणजेच अॅपद्वारे तसेच ऑफलाईन देखील अर्ज करु शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आगारात येण्याची गरज भासणार नाही. या योजनेची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी सवलतीच्या बसपास योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in