मुंबई : मुंबईतील ७० वर्षीय रूग्ण मोहन शाह हे नोव्हेंबर २०२२ मध्ये घरी कोसळले होते. त्यांच्यावर तेव्हा उपचार सुरू झाले होते. त्याचवेळेस भाटिया रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाल्यानंतर मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे आढळले. या सर्वात ते बेशुद्ध अवस्थेतच होते. त्यांच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी डाॅक्टरांना त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली, जेथे त्यांच्या डोक्याची अर्धी कवटी काढून जतन करावी लागली. त्यांचे वय आणि इतर वैद्यकीय स्थिती पाहता शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, डाॅक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार करत त्यांना जीवदान दिले. या रुग्णावर आधी हृदयाची शस्त्रक्रिया देखील झाली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अखेर त्यांच्यामध्ये सुधारणा दिसू लागली आणि तीन महिन्यांनंतर ते घरी परतले. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर बरे होणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंब्याने त्यांच्या यशस्वी पुनर्वसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.