
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी एअर इंडियावर ‘सतत गैरव्यवस्थापन’ केल्याबद्दल टीका करत प्रीमियम भाडे भरूनही प्रवाशांना विमान विलंबांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले.
सुळे प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला १ तास १९ मिनिटे उशिर झाल्यानंतर त्यांची संतप्त प्रतिक्रिया आली. प्रीमियम भाडे भरूनही विमानांना विलंब होतो यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी वारंवार होणाऱ्या विलंबासाठी विमान कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी केली.
विमानांना अविरत विलंब होतो, हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रीमियम भाडे देतो तरीही विमाने वेळेवर येत नाहीत. मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच या सततच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसतो, असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.
सुळे म्हणाल्या की, त्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI0508 ने प्रवास करत होत्या. ते १ तास १९ मिनिटे उशिराने आले.
वारंवार होणाऱ्या विलंबासाठी एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांना जबाबदार धरण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सेवा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी सुळे यांनी केली. सुळे यांनी दावा केला की, फ्लाइट ट्रॅकर्समध्ये दोष होते ज्यामुळे दिशाभूल झाली.
मी विमानात दिल्ली विमानतळावर होती. ट्रॅकरवरून विमान हवेत असल्याचे दिसून आले. मी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे ट्रॅकर्सचा मुद्दा उपस्थित करेन, असे सुळे म्हणाल्या. सुळे यांच्या आरोपांबाबत एअर इंडियाला पाठवलेल्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित होते. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या महिन्यात टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने त्यांना ‘तुटलेली आणि बुडलेली’ जागा दिल्याबद्दल टीका केली होती. चौहान यांच्या संतापानंतर सहकारी मंत्री के. राममोहन नायडू यांनी विमान कंपनीला कारवाई करण्याचे निर्देश दिले.