
मुंबई : मुंबई महापालिकेच्या न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत अलीकडच्या काळात दोन वेळा टॅब चोरीची घटना घडली. त्यामुळे शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेमध्ये एकूण ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असूनही शाळेस पूर्णवेळ मुख्याध्यापक तसेच शिपाई नियुक्त करण्यात आले नसल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांना पार पाडाव्या लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
मुंबईमध्ये पालिकेच्या शाळांची तसेच विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असतानाही पालिकेचा शिक्षण विभाग शिक्षण धोरण सुधारत नसल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत दोन वेळा टॅब चोरीची घटना घडली आहे. तसेच, ५०० हून अधिक विद्यार्थी असलेल्या या शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही तसेच शिपाईही नाही. तसेच या शाळेत लिपिकही नसल्यामुळे सर्व कार्यालयीन कामे शिक्षकच करत असून त्यामुळे अध्यापनावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या ४९ शाळांमध्ये अनेक ठिकाणी लिपिक, शिपाई तसेच मुख्याध्यापकच नसल्याचे निदर्शनास आले आहे, नव्याने स्थापन झालेल्या १९९ माध्यमिक शाळांमध्ये लिपिक व शिपाई मुख्याध्यापकांची पदेच नाहीत. त्यामुळे या पदावर अद्याप कोणतीही नियुक्ती नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे मत शिक्षण संघटनेचे शिवनाथ दराडे यांनी व्यक्त केले.
पूर्णवेळ मुख्याध्यापक नेमण्याची मागणी
टॅब चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तरीसुद्धा, सदर शाळेत आवश्यकतेनुसार शिपाई, लिपिक व पूर्णवेळ मुख्याध्यापक यांची त्वरित नेमणूक करून शाळेचा शैक्षणिक व प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती पालकांनी केली आहे.